ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर
ओव्या ४२७ ते ४८१
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥
आणि येतुलाही आरोगण, करितां भुके नाहीं उणेपण,
कैसें दीपन असाधारण, उदयलें यया ॥ ४२७ ॥
आरोगण =भक्षण दीपन=ज्वलन (जठराग्नी)
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणगा दुकाळु पाहला,
तैसा जिभांचा लळलळाटु देखिला, आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
भणगा=भणंग दुकाळु=दुष्काळ लळलळाटु=वळवळ
आवाळुवें=ओठकडा
तैसें आहाराचे नांवें कांहीं, तोंडापासूनि उरलेंचि नाहीं,
कैसी समसमीत नवाई, भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
समसमीत=प्रखर
काय सागराचा घोंटु भरावा ?, कीं पर्वताचा घांसु करावा ?,
ब्रह्मकटाहो घालावा, आघवाचि दाढे ॥ ४३० ॥
दिशा सगळियाचि गिळाविया, चांदिणिया चाटूनि घ्याविया,
ऐसें वर्तत आहे साविया, लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
साविया=सहज स्वाभाविक
जैसा भोगीं कामु वाढे, कां इंधनें आगीसि हाकाक चढे,
तैसी खातखातांचि तोंडें, खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
हाकाक=भडका खाखांतें=भूक
कैसें एकचि केवढें पसरलें, त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें,
जैसें कां कवीठ घातलें, वडवानळीं ॥ ४३३ ॥
ऐसीं अपार वदनें, आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें,
कां आहारु न मिळतां येणें मानें, वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
येतुलीं कैंचीं =एवढी कुठाय
अगा हा लोकु बापुडा, जाहला वदनज्वाळां वरपडा,
जैसी वणवेयाचिया वेढां, सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
वरपडा=प्राप्त
आतां तैसें यां विश्वा जाहालें, देव नव्हे हें कर्म आलें,
कां जग चळचळां पांगिलें, काळजाळें ॥ ४३६ ॥
कर्म=कर्मगती
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे, कोणीकडूनि निगिजैल चराचरें,
हीं वक्त्रें नोहेती जोहारें, वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
वागुरे=जाळे जोहारें=चिता
(लाक्ष्यागृह )
आगी आपुलेनि दाहकपणें, कैसेनि पोळिजे तें नेणे,
परी जया लागे तया प्राणें, सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥
नातरी माझेनि तिखटपणें, कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें,
कां आपुलियां मारा नेणें, विष जैसें ॥ ४३९ ॥
निवटे= नष्ट करणे घात
करणे
तैसी तुज कांहीं, आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं,
परी ऐलीकडिले मुखीं खाई, हो सरली जगाची ॥ ४४० ॥
सेचि=भान हो सरली=काळजी
अगा आत्मा तूं एकु, सकळ विश्वव्यापकु,
तरी कां आम्हां अंतकु, तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवांही न धरावी भीड,
मनीं आहे तें उघड, बोल पां सुखें ॥ ४४२ ॥
किती वाढविसी या उग्ररूपा, आंगींचें भगवंतपण आठवीं बापा,
नाहीं तरी कृपा, मजपुरती पाही ॥ ४४३ ॥
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥
तरी एक वेळ वेदवेद्या, जी त्रिभुवनैक आद्या,
विनवणी विश्ववंद्या, आइकें माझी ॥ ४४४ ॥
ऐसें बोलोनि वीरें, चरण नमस्कारिलें शिरें,
मग म्हणें तरी सर्वेश्वरें, अवधारिजो ॥ ४४५ ॥
मियां होआवया समाधान, जी पुसिलें विश्वरूपध्यान,
आणि एकेंचि काळें त्रिभुवन, गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥
तरी तूं कोण कां येतुलीं, इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं,
आघवियाचि करीं परिजिलीं, शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
जी जंव तंव रागीटपणें, वाढोनि गगना आणितोसि उणें,
कां डोळे करूनि भिंगुळवाणे, भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
भिंगुळवाणे,=भितीदायक (वटारून )
एथ कृतांतेंसि देवा, कासया किजतसे हेवा,
हा आपुला तुवां सांगावा, अभिप्राय मज ॥ ४४९ ॥
या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु,
आणि कायिसयालागीं असे वाढतु, उग्रतेसी ॥ ४५० ॥
श्रीभगवानुवाच।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥
तरी मी काळु गा हें फुडें, लोक संहारावयालागीं वाढें,
सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें, आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
सैंघ=अनेक
एथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलों मागिल्या संकटा,
म्हणौनि आळविला तंव वोखटा, उवाइला हा ॥ ४५२ ॥
कटकटा=अरेरे वोखटा,=वाईट(रित्या) उवाइला= विस्तारला (प्रसन्न
झाला)
तेवींचि कठिण बोलें आसतुटी, अर्जुन होईल हिंपुटी,
म्हणौनि सवेंचि म्हणे “किरीटी, परि आन एक असे” ॥ ४५३ ॥
आसतुटी=आशा तुटणे, वाईट वाटणे हिंपुटी,=दु:खी
तरी आतांचिये संहारवाहरे, तुम्हीं पांडव असा बाहिरे,
तेथ जातजातां धनुर्धरें, सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
संहारवाहरे= संहार रुपी संकट
होता मरणमहामारीं गेला, तो मागुता सावधु जाहला,
मग लागला बोला, चित्त देऊं ॥ ४५५ ॥
ऐसें म्हणिजत आहे देवें, अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें,
येर जाण मी आघवें, सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
वज्रानळीं प्रचंडीं, जैसी घापे लोणियाची उंडी,
तैसें जग हें माझिया तोंडीं, तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥
तरी तयामाझारीं कांहीं, भरंवसेनि उणें नाहीं,
इये वायांचि सैन्यें पाहीं, बरवतें आहाती ॥ ४५८ ॥
बरवतें= मिरवणे
ऐसा चतुरंगाचिया संपदा, करित महाकाळेंसीं स्पर्धा,
वांटिवेचिया मदा, वघळले जे ॥ ४५९ ॥
वांटिवेचिया=पुरुषार्था वघळले-=वल्गना करती
हे जे मिळोनियां मेळे, कुंथती वीरवृत्तीचेनि बळें,
यमावरी गजदळें, वाखाणिजताती ॥ ४६० ॥
मृत्यूदेव
यमा पेक्षा गजदळ वाखाणती
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं, आण वाहूनि मृत्यूतें मारूं,
आणि जगाचा भरूं, घोंटु यया ॥ ४६१ ॥
पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरी जाळूं,
कां बाणवरी खिळूं, वारयातें ॥ ४६२ ॥
बोल हतियेराहूनि तिखट, दिसती अग्निपरिस दासट,
मारकपणें काळकूट, महुर म्हणत ॥ ४६३ ॥
दासट,=दाहक महुर=गोड
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळें,
अगा चित्रीव फळें, वीर हे देखें ॥ ४६४ ॥
उमाळे=उसळ्या पेंडवळें,=भेडोळे
हां गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला,
इया शृंगारूनियां खाला, मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥
खाला=कातडी
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥
येर चेष्टवितें जें बळ, तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ,
आतां कोल्हारिचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
कोल्हारिचे=कुंभाराचे मातीचे
हालविती दोरी तुटली, तरी तियें खांबावरील बाहुलीं,
भलतेणें लोटिलीं, उलथोनि पडती ॥ ४६७ ॥
तैसा सैन्याचा यया बगा, मोडतां वेळू न लगेल पैं गा,
म्हणौनि उठीं उठीं वेगां, शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
बगा,=देखावा
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें, घातलें मोहनास्त्र एकसरें,
मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें, आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
महाभेडें=महा भित्रा आसडूनि=वस्त्रहरण करून
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें, निवटीं आयितें रण पडिलें,
घेईं यश रिपु जिंतिले, एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
निपटारें=निस्तेज निवटीं=नष्ट कर
आणि कोरडें यशचि नोहे, समग्र राज्यही आलें आहे,
तूं निमित्तमात्रचि होयें, सव्यसाची ॥ ४७१ ॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४॥
द्रोणाचा पाडु न करीं, भीष्माचें भय न धरीं,
कैसेनि कर्णावरी, परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥
पाडु=पर्वा
कोण उपायो जयद्रथा कीजे, हें न चिंतूं चित्त तुझें,
आणिकही आथि जे जे, नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥
नावाणिगे=नावाजले
तेही एक एक आघवें, चित्रींचे सिंहाडे मानावे,
जैसे वोलेनि हातें घ्यावें, पुसोनियां ॥ ४७४ ॥
यावरी पांडवा, काइसा युद्धाचा मेळावा ?,
हा आभासु गा आघवा, येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
हा आभासु गा आघवा, येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
जेव्हां तुवां देखिले, हे माझिया वदनीं पडिले,
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें, आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
सोपें=सोपटागत रिते
म्हणौनि वहिला उठीं, मियां मारिले तूं निवटीं,
न रिगे शोकसंकटीं, नाथिलिया ॥ ४७७ ॥
वहिला=लवकर निवटीं=मार
आपणचि आडखिळा कीजे, तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे,
तैसें देखें गा तुझें, निमित्त आहे ॥ ४७८ ॥
आडखिळा=निशाण खुण विंधोनि=बाण मारून
बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें,
आतां राज्येंशीं संचलें, यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥
सावियाचि उतत होते दायाद, आणि बळिये जगीं दुर्मद,
ते वधिले विशद, सायासु न लागतां ॥ ४८० ॥
उतत =उतणे उन्मत दायाद= (वडिलोपार्जित
संपत्तीने) भाऊबंद
ऐसिया इया गोष्टी, विश्वाच्या वाक्पटीं,
लिहूनि घाली किरीटी, जगामाजीं ॥ ४८१ ॥
ही कीर्ती मिळव (विश्वरूपी पटावर नाव लिहून)
by
विक्रांत प्रभाकर तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ